उत्तम गुण अभ्यासितां येती। - भाग २

।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 
        या रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओ च्या काळात माझ्या पत्राचे बहुतेक वाचक संपूर्ण वाचणारे आहेत म्हणून सगळ्यांचेच मनापासून आभार. प्रत्येक आठवड्यात एक पत्र मग त्याचे मस्त मस्त रिप्लाय. रविवार असा मस्त जातो ना माझा. काय सांगावं! मी नेहमी कमीतकमी शब्दात एक विचार तुमच्या पर्यंत पोहोचवणे आणि तो कृतीत आणण्याची तुमच्यामधे इच्छा निर्माण  करण्याचा  माझा प्रयत्न मी कायम सुरु ठेवेन. 
        आजच्या पत्रात वाचूया नाही शिकलो नवीन स्किल्स तर काय होणार हे समर्थ कसे सांगत आहेत ते. लेट्स गो!
सदाकोपी 
            दासबोधामधे चातुर्य लक्षण समासामधली एक ओवी आहे.

प्रेत्न करीना सिकेना ⁠। शरीर तेंहि कष्टवीना ⁠। 
उत्तम गुण घेईना ⁠। सदाकोपी ⁠।⁠।⁠ ११ ⁠।⁠।

        या पत्राच्या पहिल्या भागात आपण वाचलं होतं की कसे समर्थ आपल्याला नवीन स्किल्स शिकून घे म्हणून सांगत आहेत ते. तुमचा पहिला भाग वाचायचा राहिला असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तो वाचू शकता उत्तम गुण अभ्यासितां येती। - भाग १ 
        पण पुढच्या काही ओव्यांमधे समर्थ सांगतात तू प्रयत्न सोडले तर काय होईल. जो व्यक्ती काहीतरी नवीन शिकण्याचे प्रयत्न थांबतो, जो नवीन शिकण्यासाठी कष्ट घेणं बंद करतो, ज्याला उत्तम गुण घेण्याची जी एक प्रोसेस आहे ती कंटाळवाणी वाटायला लागते म्हणजे ज्याला नवीन चांगलं शिकण्यात काही इंटरेस्ट रहात नाही तो पुढे जाऊन रागीट बनतो, चिडचिडा बनतो


        कष्ट करणं सोडणे, जितकं मिळालं आहे त्या मधे खुश रहाणे, त्या नंतर चिडचिड हे सगळं एक मेकांसोबत जोडलेलं आहे. म्हणून कष्ट करायचे सोडणे ही झाली शेवटाची सुरुवात. पण आज प्रत्येक गोष्ट जर विकायची आहे तर ती कंफर्ट मधे मोजली जाते. जितकी जास्त कंम्फरटेबल तितकी जास्त किंमत. पण ती घेऊन तुम्ही कष्ट सोडणारं आहात, प्रयत्न सोडणारं आहात तर विचार करा खरंच घ्यायची का ते!

मी uncomfertable रहायचं?
        अरे पण असं कसं म्हणतो तू? पैसे कमवून मी uncomfertable रहायचं? मग केलीच कशाला मेहनत? कशाला कमावला इतका पैसा?  खरं सांगू का तर उत्तर हो आहे. नाही आवडणारं तुम्हाला पण आज नाही तर उद्या खरं ऐकावं लागेल ना. तर आजचं ऐका. 
     अगदीच पैसे कमवून अवघड परिस्थिती राहायचं असा अर्थ घेऊ नका. प्रॉब्लेम घाई करण्याचा आहे.  कारण  समर्थ संपूर्ण समजावून सांगतात. 

अंतर्कळा श्रुंघारावी ⁠। नानापरी उमजवावी ⁠। 
संपदा मेळऊन भोगावी ⁠। सावकास ⁠।⁠।⁠ १० ⁠।⁠।

            ते म्हणतात तुझे सगळे अंतरंग वेगवेगळ्या गुणांनी छान दिसू दे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त कर. भरपूर संपत्ती मिळवं पण त्याचा उपभोग सावकाश कर, हळू हळू कर, निवांत कर. उत्तम गुणांचा अभ्यास कधी कर? नेहमी. एक क्षण पण वाया गेला नाही पाहिजे इतका अभ्यास कर. पण त्या मुळे मिळणाऱ्या संपत्ती चा उपभोग सावकाश हळू हळू घे. 


        पण सहसा होतं उलटं. आपण बरेचदा आपण धडपड करून काहीतरी मिळवतो. ते मिळालं की त्याच्या सोबत प्रसिद्धी येते, पैसा येतो, नवीन नवीन ओळखी येतात, नवीन नवीन सोयी येतात पण या सगळ्या गोष्टींचा उपभोग सावकाश घ्यावा. आपलं पाहिलं लक्ष हे नवीन शिकण्यावर आणि उत्तम गुण जोडून घेण्यावर पाहिजे.
        अजून एक उदाहरणं सांगू का? जॉब लागून जर हातात एक ते दोन लाखांचा फोन घेण्याची शक्ती आली आणि तो फोन घेतला तर त्या फोन चा उपयोग गेम खेळून वेळ वाया घालण्यावर न देता फोन चा वापर करून अजून नवीन काहीतरी शिकण्यावर केला पाहिजे. 

कसं म्हणावं शहाणं तुम्हाला?

आळसें कार्येभाग नासतो ⁠। साक्षेप होत होत होतो ⁠।
दिसते गोष्टी कळेना, तो- ⁠। शाहाणा कैसा ⁠।⁠।⁠ २७ ⁠।⁠।

        हा समास संपवता संपवता समर्थ म्हणतात की आळस केला की काम होणार नाही हे तर पक्क आहे. रोज थोडं थोडं करत गेलं की काम होतं हे पण पक्क आहे. ज्याला डोळ्याने दिसणारी इतकी साधी गोष्ट कळत नाही त्याला कसं काय शहाणं म्हणावं? 


        एक जानेवारी ला मोटिवेट होऊन मी आता व्यायाम करणारं हे ठरवण्याची गरजच नाही जर रोज १५ मिनिटं जरी व्यायाम केला तरी प्रकृती आपण उत्तम रहातो. खूप जास्त डायट, हेच पाहिजे, तेच नको करायची गरज नाही खाण्याच्या वेळा नियमित ठेऊन पोटापेक्षा थोडं कमी खाल्लं तरी आपण टुणटुणीत रहातो. रोज एक ओवी समजून घेतो असं जरी ठरवलं तरी सगळ्या ग्रंथांचा अभ्यास होऊ शकतो. पण म्हणतात ना ही गोष्ट साधी आहे सोप्पी नाही.
        ही ओवी वाचून आपल्यालाच ठरवायचं आहे की समर्थांच्या समोर किंवा आपल्या आपल्या सद्गुरुंच्या समोर आपण शहाणे का वेडे. चला आळस सोडूया, कष्ट वाढवूया आणि शहाणे होण्याचा प्रयत्न करूया. 

    आपण भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि शहाणे होण्याचा प्रयत्नात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.


-------------------------------------------------------------------------------------------------------

मला इथून पुढे लिहिण्याची इच्छा नव्हती पण तरीही लिहितो आहे आणि तुम्हीही वाचा.

        मी माझे लिहिण्याचे प्रयत्न दोन ते तीन वर्षांपासून सुरु केले. प्रत्येक आठव्यात रविवारी एक म्हणजे वर्षाचे ५२ असे जवळपास १५० पत्र माझे लिहून झाले आहेत. या लिखाणाच्या प्रवासात मला खूप सारे लोकं भेटतं गेले. काही माझे खूप चांगले मित्र झाले. काही जुने मित्र पत्र वाचून खुश होतात. काही ठिकाणी माझी लेखक म्हणून ओळख केली जाते. पण या सगळ्या ओळखींमधे काही ओळखी अशा आहेत ज्यांना मी फक्त कॉल वर किंवा पत्राला आलेला रिप्लाय इतकंच ओळखतो. माझी कधी त्यांच्या सोबत भेट झालीच नाही. भेटू भेटू असं बोलणं खूपदा झालं पण नाहीच जमलं. 
        या माझ्या सगळ्या वाचकांपैकी एक भावना ताई म्हणून होत्या. हो होत्या लिहितो आहे. कारण दोन दिवसांपूर्वी मला माझ्या एका दादाचा फोन आला आणि तो म्हणाला की, "अरे अजिंक्य, एक अकॅसिडेंट झाला आणि भावना ताई आता आपल्या मधे नाहीत." 
        आपण जेंव्हा जेंव्हा काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तेंव्हा घरचे नेहमीच कौतुक करतात. पण काहीही ओळख नसताना कौतुक करणाऱ्या भावना ताई या माझ्या आयुष्यात पहिल्याच होत्या. आणि फक्त छान लिहितो असं नाही. भरभरून कौतुक करायच्या जशी काही आमची लहानपणी पासून मैत्री आहे. तुम्ही जर माझ्या whatsappच्या ग्रुप मधे आहात तर त्यांचे मागचे सगळे मेसेज तुम्हाला आजही वाचता येतील. पहिला रिप्लाय कोणाचा असायचा तर भावना ताई. मी रविवारी ९ च्या ऐवजी ९ वाजून ५ मिनिटाला पत्र पाठवले तर पर्सनल नंबर वर त्यांचा मेसेज येतं होता मला, आजच पत्र का आलं नाही म्हणून! त्या माझ्या शहरात नाही रहायच्या. आमचं जितकं बोलणं झालं त्या मधून त्या शिक्षिका आहेत हे मला समजलं होतं. 
        मला माझ्या वाचकांपैकी जर कोणाला भेटायची इच्छा होती तर त्या भावना ताई होत्या, पण ही भेट आता कधीच होणार नाही. काय गणितं असतात देवाचं त्यालाच माहिती. काही दिवसांपूर्वी एका रविवारी पत्र वाचून त्यांनी मला फोन केला. भरपूर गप्पा मारल्या आणि फोन ठेवताना मला म्हणे, "अजिंक्य तू लिहीण कधीही थांबवू नकोस. खूप छान लिहितोस. असाच लिहितं रहा." 


        भावना ताई तुम्हाला मी मनापासून नमस्कार करून सांगतो की मी नेहमी सोप्प्या शब्दात लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरु ठेवेन. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे खुश रहा आणि छान रहा ................... मला नाही माहिती काय लिहावं ह्याच्या पुढे. 
        भावना ताई, आपली कधी भेट झालीच नाही पण तुमच्या बोलण्यावरून, रिप्लाय वरून, whatsapp च्या फोटो वरून तुमचं जे काही एक चित्र माझ्या मनात आहे ते मी छान तसंच जपून ठेवेन. 

भेटूया एखाद्या पुढच्या पत्रात. धन्यवाद. 🙏🙏🙏

---------------------------------------------------------------------------------------------------------








Post a Comment

0 Comments